पावस : यावर्षी पावसाने उशिरापर्यंत आपली वाटचाल सुरू ठेवल्यामुळे गावखडी समुद्रकिनारी परिसरामध्ये ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे पिल्लांनी अद्याप समुद्राकडे झेप घेतली नाही. त्यामुळे सध्या उशिरा हंगाम सुरू झाल्यामुळे या कासव संवर्धन केंद्रामध्ये १३ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील एकमेव अशा गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कासवाची अंडी संरक्षित केली जातात. त्यामुळेच या संवर्धन केंद्राला अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. इतर किनाऱ्यांच्या तुलनेमध्ये याठिकाणी प्राणीमित्र विशेष काळजी घेऊन घरट्यांचे संरक्षण केले जाते. हा किनारा कासवांकरिता सुरक्षित असल्यामुळे हमखास ही कासवे या किनाऱ्यावरती अंडी घालून मार्गक्रमण करीत असतात.
डिसेंबर महिन्यामध्ये गावखडी समुद्रकिनाऱ्यावरती कासव मित्रांनी गेल्या महिन्याभरामध्ये तेरा घरट्यांच्या माध्यमातून चौदाशे अंडी संरक्षित केली आहेत. या कासव संवर्धन केंद्राकडे वन विभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवले जाते. त्याकरिता त्यांची गस्त सुरू असते, जेणेकरून कासव संवर्धन व्यवस्थितरित्या होते की नाही, त्यांना काय अडचणी येतात, याकडे वन विभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवले जाते.
यासंदर्भात कांदळवन क्षेत्र प्रमुख बिराडे यांच्याशी संपर्क केला असता, ज्याप्रमाणे या कार्यक्षेत्रामध्ये कांदळवन लागवड व त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर असल्याने त्याकडे विशेष लक्ष ठेवले जाते. हे करत असताना या परिसरातील कासव संवर्धन केंद्राकडे विशेष लक्ष ठेवून त्यातील अडीअडचणीबाबत विचार विनिमय केला जातो, असे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 23/Jan/2026














