Yogesh Kadam | जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ‘२१-०’चे लक्ष्य : मंत्री योगेश कदम

खेड : तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत ७ आणि पंचायत समिती निवडणुकीत १४ असे मिळून एकूण २१ उमेदवार उभे असून, या निवडणुकीतही ‘२१-०’ असा महायुतीला दणदणीत विजय मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्री योगेश कदम पुढे म्हणाले की, काही लोकप्रतिनिधींनी गावागावात २० ते २५ कोटी रुपयांच्या विकासपत्रांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर कागदोपत्री आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये काही जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या शिफारसी, तर काही त्यांच्या स्वतःच्या निधीतून दिल्या जात आहेत. परंतु कागदावर दिलेली पत्रे म्हणजे विकास नाही, अशी टीका ना. कदम यांनी केली.

खरा विकास म्हणजे कामाच्या माध्यमातून जनतेच्या जीवनात बदल घडवणे, हे अधोरेखित करताना त्यांनी माजी मंत्री रामदास कदम यांची विकास कार्यक्षमता विशेषत्वाने अधोरेखित केली. रामदास कदम यांनी खेड तालुक्याचा चेहरामोहरा बदलला असून रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी त्यांनी काम केले. आता हा विकास पुढे न्यायचा असेल तर आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निवडणुकीतील विजयाबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला. संपूर्ण तालुक्यात या वक्तव्याची चर्चा रंगली असून, निवडणूक लढतीला आणखी रंग चढेल, असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 23/Jan/2026