Ratnagiri : जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा पिकावरील फुलकीड नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सरसावले आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी विशेष वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शक मालिकेचे तिसरे ऑनलाईन सत्र आज (४ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

आता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या वेबिनारमध्ये तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन मिळणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बागायतदारांशी थेट संवाद साधून तांत्रिक माहिती देतील. कीड व रोग नियंत्रण यामध्ये प्रामुख्याने फुलकीड आणि इतर रोगांवर प्रभावी व वेळेत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाईल. बदलत्या वातावरणात आंबा मोहोर टिकवून धरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाईल. तसेच शेतकऱ्यांना आपल्या बागेतील समस्यांबाबत शास्त्रज्ञांना थेट प्रश्न विचारून उत्तरे मिळवता येतील.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या बागेचे रक्षण आणि दर्जेदार उत्पादनासाठी या वेबिनारमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या भागातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 04/Feb/2026