Ratnagiri : हातीस ऊरुसानिमित्त फिरत्या हॉटेल व्यवसायासाठी आलेल्या कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : हातीस येथील ऊरुसानिमित्त फिरत्या हॉटेलचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या पूणे येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.40 वा. सुमारास घडली. विजय रामभाउ लाड (70, रा. संगमनगर भोकड सांगवी, पूणे) असे आकस्मिकमृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत हॉटेल मालक बाळू दादा भोसले (रा. विरंगानगर लिंक रोड पंढरपूर, सोलापूर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, बाळू भोसले यांचा फिरत्या हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये विजय लाड हे जेवण बनवण्यासाठी कामाला होते. सन 2025 मध्येही पंढरपूरहून हातीस येथील ऊरुसानिमित्त बाळू भोसले यांनी आपले हॉटेल लावलेले होते. त्यावेळेही विजय लाड त्यांच्यासोबत जेवण बनवण्यासाठी आले होते.

दरम्यान, यावर्षी 2026 मध्ये हातीस ऊरुस असल्याने हॉटेल मालक बाळू भोसले हे कामगार विजय लाड यांना घेउन हातीसला आले होते. त्याठिकाणी त्यांना आपले सुनिल कॉर्नर हे हॉटेल थाटले होते. सोमवार 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा. सुमारस विजय लाड यांच्या छातीत डाव्या बाजुला दुखू लागल्याने हॉटेल मालक बाळू भोसले यांनी त्यांना बाजूला असलेल्या रावटीमध्ये आराम करण्यासाठी सांगितले. मध्यरात्री 2.30 वा. सुमारास सर्व काम आटोपल्यावर सर्वजण झोपी गेले होते. त्यांनंतर पहाटे 3.30 वा. सुमारास उरुसातील लोकांचा मोठ्याने आवाज येउ लागल्याने बाळू भोसले यांनी जाउन पाहिले असता त्यांना विजय लाड हे एका खुर्चीवर बेशूध्द अवस्थेत दिसून आले. तसेच त्यांच्या तोंडातून फेसही येत असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.40 वा. सुमारास वैद्यकिय अधिकाऱ्यांनी विजय लाड यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 04/Feb/2026