Ratnagiri: जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाची भरारी

◼️ महायुतीचा निर्णय पथ्यावर ; टिकाकारांच्या डोळ्यात अनिकेत पटवर्धनांकडुन झणझणीत अंजन

रत्नागिरी, ता. ०९ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती करण्याच्या निर्णयाचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाच्या कोअर कमीटीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती नेहमी शुन्यात दिसत होती. परंतु या निवडणुकीत ४ गट आणि १६ गणामध्ये भाजपणे विजयी मिळवित घवघवीत यश संपादन केले. जिल्हा समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन आणि अनिकेत पटवर्धन यांच्या निर्णयाचे हे फलित आहे. परंतु यावरून अनिकेत पटवर्धन यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली होती. भाजप संपवणार म्हणणाऱ्यांना अनिकेत पटवर्धन यांनी या यशानंतर डोळ्यात झणझणीत अंजन घातले, असे म्हणावे लागेल.

​काही महिन्यांपूर्वी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये २०१७ ते २०२२ पर्यंत पक्षाचे संख्याबळ नगण्य दिसत होते. मात्र, महायुतीचा निर्णय आणि कार्यकर्त्यांनी जमिनीवर केलेले काम यामुळे हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. भाजपने केवळ अस्तित्वच सिद्ध केले नाही, तर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा निर्णायक ‘टक्का’ असल्याचेही दाखवून दिले आहे. ​या मोठ्या यशाचे श्रेय प्रामुख्याने जिल्हा समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन आणि युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांना दिले जात आहे. अनिकेत पटवर्धन यांनी गेल्या काही काळापासून ग्रामीण भागात संघटना बांधणीवर विशेष भर दिला होता. निवडणूक काळात योग्य उमेदवारांची निवड आणि महायुतीतील घटक पक्षांशी असलेला समन्वय यामुळेच ४ गट आणि १६ गणांमध्ये कमळ फुलू शकले.

​विशेषतः अनिकेत पटवर्धन यांच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका केली जात होती. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. “काम बोलतं, टीका नाही,” अशा शब्दांत भाजप समर्थकांनी आता सोशल मीडियावरच विरोधकांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ​या विजयामुळे रत्नागिरीच्या राजकारणात भाजपची ताकद अधोरेखित झाली आहे. याआधी जिल्ह्यात भाजप केवळ मर्यादित क्षेत्रापुरती मर्यादित असल्याचे बोलले जात होते. मात्र, १६ गणांमधील विजय हा पक्ष आता घराघरांत पोहोचल्याचा पुरावा आहे. आगामी काळातील इतर निवडणुकांसाठी हा निकाल भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार आहे. त्यामुळे अनिकेत पटवर्धन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एवढेच नाही तर या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत आणि अनिकेत पटवर्धन यांचे संबंधत देखील किती सलोख्याचे आहे हे स्पष्ट झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:57 09-02-2026