गुहागर: गुहागर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या १० वर्षांपासून आमदार भास्कर जाधव यांचे असलेले एकहाती वर्चस्व मोडीत काढत, महायुतीने (शिवसेना-भाजप) गुहागर पंचायत समितीवर दणदणीत विजय मिळवला आहे. पंचायत समितीत स्पष्ट बहुमत मिळवत महायुतीने सत्ता स्थापन केली असून, जिल्हा परिषदेतही युतीचेच पारडे जड राहिले आहे. या निवडणुकीत ‘उबाठा’ आणि मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
जिल्हा परिषद: महायुतीचे वर्चस्व, मनसे आणि उबाठाचे खाते उघडले
जिल्हा परिषद गटांच्या निकालात महायुतीच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी बाजी मारली आहे:
- कोंडकारूळ गट: भाजपच्या अपूर्वा अनंत बारगुडे विजयी झाल्या.
- वेळणेश्वर गट: शिवसेनेच्या नेत्रा नवनीत ठाकूर यांनी विजय मिळवला.
- पाचेरीसडा गट: शिवसेनेच्या सुचिता घाणेकर विजयी झाल्या.
- तळवली गट: भाजपचे मंगेश जोशी यांनी विजय संपादन केला.
- श्रृंगारतळी गट: येथे मनसेचे प्रमोद गांधी विजयी झाले.
- असगोली गट: या एकमेव गटात ‘उबाठा’चे विक्रांत जाधव विजयी झाले.
पंचायत समिती गण: शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी
पंचायत समितीच्या गणांमध्ये शिवसेनेने जोरदार कामगिरी करत सर्वाधिक जागा खिशात घातल्या आहेत:
- शिवसेना विजयी उमेदवार: प्रणव पोळेकर (कोंडकारूळ), संदीप गोरिवले (वेळणेश्वर), महेश नाटेकर (पडवे), गौरव वेल्हाळ (श्रृंगारतळी), सारिका दाभोळकर (अंजनवेल).
- भाजप विजयी उमेदवार: मानसी सांगळे (मळण), स्नेहा शिगवण (शीर), नीलेश सुर्वे (पडवे).
- उबाठा: असगोली गणातून उर्दी खैर यांनी विजय मिळवला.
आ. भास्कर जाधवांना मोठा धक्का, सभापती निवडीकडे लक्ष
आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. गेले दशकभर गुहागर पंचायत समितीवर त्यांचे वर्चस्व होते, मात्र यावेळी मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, आता गुहागर पंचायत समितीचा नवा सभापती कोण होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने सभापती पद शिवसेनेच्या पदरात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
निकाल जाहीर होताच गुहागर शहरासह ग्रामीण भागात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. महायुतीच्या नेत्यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांचा विकासकामांवरील विश्वासाला दिले आहे.













