रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. याचा सांगता सोहळा येत्या ४ व ५ मे रोजी खातू नाट्यमंदिरात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह, विश्वस्त मंडळ, सल्लागार आणि नियामक मंडळाचे सदस्य, प्राचार्य यांनी केले आहे. सांगता सोहळ्याची जय्यत तयारी महाविद्यालयात सुरू आहे.
कोकणामध्ये शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पी. जी. अभ्यंकर कला व वाणिज्य आणि आर.बी कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १४ जून 1976 मध्ये स्वर्गीय ऍड. जनार्दन वामन तथा बाबुराव जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मालतीबाई जोशी यांनी केली. 1975 साली 10+2+3 हा नवीन शैक्षणिक आकृतीबंध महाराष्ट्रात लागू झाला आणि 14 जून 1976 रोजी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या उदात्त ध्येयातून संस्थापक दाम्पत्य कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांच्या प्रेरणेतून हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. सुरुवातीला कला वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखा सुरू झाल्या. त्यावेळी हे कनिष्ठ महाविद्यालय गोगटे- जोगळेकर कनिष्ठ महाविद्यालय या नावाने ओळखले जायचे. 1984 मध्ये सुप्रसिद्ध व्यावसायिक आर.बी. कुळकर्णी यांच्या उदार देणगीतून विज्ञान शाखेला आर. बी. कुळकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय हे नाव मिळाले.
1992 मध्ये एम. सी. व्ही. सी. विभाग सुरू झाला.1994 मध्ये सुप्रसिद्ध आंबा व्यावसायिक अभ्यंकर कुटुंबीयांच्या उदार देणगीतून पी.जी. अभ्यंकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले. तत्कालीन संस्था कार्याध्यक्ष अॅड. अरुअप्पा जोशी आणि माजी प्राचार्य कै. डॉ. सुभाष देव यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचा देदीप्यमान प्रवास सुरू झाला. आज या महाविद्यालयामध्ये जवळपास २८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज महाविद्यालयाने कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामांकित कॉलेज म्हणून ओळख मिळविली आहे आणि स्वतःचे स्थान तयार केले आहे.
बदलत्या काळामध्ये शिक्षणाची गुणवत्ता व पुढील प्रवेशामधील स्पर्धा ही आव्हाने पेढण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील राहिले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
नवीन शैक्षणिक धोरण व स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत शैक्षणिक सुविधा देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक कटिबद्ध आहेत. आज महाविद्यालयात सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब्स, उत्तम ग्रंथालय, सर्व सुविधांनी युक्त असा जिमखाना , क्रीडांगण व विद्यार्थी विद्यार्थीनी वसतिगृह अशा अनेक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाची परंपरा कायम राखण्यासाठी रत्नागिरी पॅटर्न, विद्वान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी सुकरपणे उपलब्ध होण्यासाठी सुयश अकॅडमी, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारी अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमी तसेच विविध परदेशी भाषा शिकण्यासाठी फॉरेन लँग्वेज सेंटर विद्यार्थ्यांना नवी कौशल्ये व नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
विद्यमान वर्षी महाविद्यालयामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान, आरोग्य तपासणी शिबिर, शहरस्तरीय अतुल्य भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा, माजी विद्यार्थी सहविचार सभा, रक्तदान शिबिर, आजी विद्यार्थी विरुद्ध माजी विद्यार्थी क्रिकेट सामना, स्कूल कनेक्ट उपक्रम व भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:21 28-04-2026















