Ratnagiri : जयगड वायूगळतीचा अहवाल चार दिवसांत

रत्नागिरी : जिंदल पोर्ट कंपनीच्या आवारात झालेल्या वायूगळतीची चौकशी मंगळवारी (ता. २४) केमिकल इंजिनिअरकडून सुरू झाली. त्यांनी इथेनॉल मरकॅप्टनची जिथून गळती झाली तेथून ते शाळेपर्यंतच अनेक नमुने घेतले आहेत. चार दिवसांत त्याचा अहवाल दिला जाईल. त्यानंतर नेमकी कशाची गळती झाली आणि त्याची तीव्रता काय होती, हे स्पष्ट होणार आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि समन्वयक तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या उपस्थितीत ही तपासणी झाली.

केमिकल इंजिनिअर प्रा. मनीषकुमार यादव यांच्यामार्फत ही तांत्रिक चौकशी सुरू आहे. जिंदल पोर्ट कंपनीच्या परिसरात असलेल्या एलपीजी गॅस टँकर पार्किंग प्लांटमधून ही गळती झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या पुढे आले होते. एलपीजी गॅसला वास नसतो. त्याची गळती झाल्यास ते लक्षात यावे यासाठी त्यामध्ये इथेनॉल मरकॅप्टन हा वायू मिसळण्यात येतो. त्यामुळे गळती झाल्याचे त्याच्या वासावरून लक्षात येते. १२ डिसेंबरला झालेल्या या वायूगळतीची तीव्रता एवढी होती की, जवळपास असलेल्या माध्यमिक विद्यामंदिरमधील सुमारे ८० मुलांना त्याची बाधा झाली. त्यांना श्वसनाचा, पोटदुखी, डोकेदुखी, मळमळणे असा त्रास सुरू झाला. कंपनीने तेव्हा प्रसंगावधान दाखवून मदत करण्याची गरज होती; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे कंपनीविरोधात जोरदार वातावरण निर्माण झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच वायूगळतीची सखोल चौकशी होण्यासाठी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली.

दोन आठवडे ही समिती चौकशी करत आहे; परंतु नेमकी वायूगळती कंपनीच्या साठवण टाकीतून झाली की, टँकर पार्किंग प्लॉटमधून झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच माध्यमिक विद्यामंदिरमध्ये पहिल्या मजल्यावरील मुलांनाच कसा त्रास झाला. इतरांना का झाला नाही? याचा उलगडा झालेला नाही. याच्या तांत्रिक चौकशीसाठी केमिकल इंजिनिअरना बोलवण्याचा निर्णय चौकशी समितीने घेतला. त्यानुसार आज केमिकल इंजिनिअर प्रा. मनीषकुमार यादव यांनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाला भेट दिली. ज्या ठिकाणाहून वायूगळती झाली तेथून ते शाळेपर्यंत तपासणी करून काही नमुने घेतले आहेत. त्याच्या अहवालानंतर या वायूगळतीचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 26-12-2024