चिपळूण : पुण्याहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिवसातून एका रेल्वेची व्यवस्था केली तर पुणे आणि कोकण रेल्वेने जोडले जाईल आणि पुण्यातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताणही कमी होईल, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
पुण्याहून कोकणात जाताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या पुण्याहून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. अशावेळी मग प्रवाशांना मुंबईमार्गे कोकणात यावे लागते; पण मुंबईमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळेच पुण्यातील रेल्वे प्रवाशांकडून पुणे ते कोकण अशी थेट रेल्वेसेवा सुरू झाली पाहिजे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने काही सणांच्यानिमित्ताने पुणे ते कोकणदरम्यान विशेष गाडी चालवली. या गाड्यांना प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता तसेच आठवड्यातून दोन फेऱ्याही सध्या सुरू आहेत; मात्र दिवसातून एकदा पुणे ते कोकण अशी रेल्वे सुरू झाली तर या मार्गावरील चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप या रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना होईल.
पर्यटन हंगामात गैरसोय
सणांसह पर्यटन हंगामामध्ये कोकणातून पुण्याला जाण्यासाठी खासगी बसेसचा पर्याय निवडला जातो; मात्र या कालावधीत प्रचंड गर्दी असल्यामुळे तिकीटदरही गगनाला भिडलेले असतात. रेल्वे सुरू केली तर कमी तिकिटात सर्वसामान्यांना प्रवास करता येईल, अशी प्रवाशांची मागणी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 14/Mar/2025














