रत्नागिरी नगरपरिषदेने कर वसुलीसाठी १२४ मालमत्ता केल्या सील

रत्नागिरी : रत्नागिरीतील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आठ जप्ती पथकांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. थकीत करदात्यांच्या नळ जोडण्या तोडताना पथकांना विरोधास सामोरे जावे लागले.

तरीही मार्च अखेरीपर्यंत तब्बल ८० टक्के वसुली करण्यात यश आले. त्याचवेळी १७२ नळ जोडण्या तोडण्यात आल्या असून १२४ मालमत्ता सिल करण्यात आल्या आहेत. एकूण मागणीच्या १४ कोटींपैकी सुमारे ११ कोटी रुपये कर वसुली झाली असल्याची रत्नागिरी नगरपरिषदेच्या वसुली विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरात सुमारे ३१ हजार २६० घरे, सदनिका, बंगले, दुकाने, गाळे आहेत. यांच्याकडून घरपट्टीची १४ कोटी रुपये कर वसुली करण्याचे आव्हान होते. अनेक मालमत्ता धारकांनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रात रांग लावून भरणा केला. परंतु मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्याकडून ही वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी ८ जप्ती पथके स्थापन केली. प्रत्यक्ष जावून या जप्ती पथकांनी थकीत कर वसुलीसाठी प्रयत्न केले.

शहराच्या काही ठिकाणी थकीत कर वसुलीसाठी गेलेल्या जप्ती पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. विनंती करुनही कर वसुली होत नसल्याचे पाहिल्यानंतर त्याठिकाणची नळ जोडणी तोडण्यात येत होती. नळ जोडणी तोडताना पथकांना जोरदार विरोधाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी थकीत करदाते आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची शाब्दिक बाचाबाचीसुद्धा झाली.

थकीत करवसुली करताना होणारा विरोध दुर्लक्षून जप्ती पथकातील अधिकारी नरेश आखाडे, जितू विचारे, उत्तम पाटील, राजन पवार, सागर सुर्वे आदींनी शांतपणे जास्तीत जास्त वसुली होण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे १४ कोटी रुपयांपैकी ११ कोटी रुपये कर वसुली झाली आहे. त्याचबरोबर १७२ नळ जोडण्या तोडण्यात आल्या असून १२४ मालमत्तांवर जप्तीच्या नोटीस चिटकविण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 04/Apr/2025