चिपळूण : पालिकेने मान्सूनपूर्व नियोजन व तयारीसाठी घेतलेल्या बैठकीत पूरमुक्तीसाठी नागरिकांनी सुचवलेल्या उपाययोजनांची गुरुवारपासून मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पाहणी सुरू केली आहे. ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
गतवर्षी अगदी पावसाच्या तोंडावरच पालिकेने अशी बैठक घेतली होती. त्यामुळे नागरिकांनी सुचवलेली कामे करण्याआधीच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे काही कामे करता आली नाहीत. त्यामुळे यावर्षी दोन महिने अगोदरच बुधवारी ही बैठक घेण्यात आली. या वेळी उपस्थित असलेल्या व्यापारी संघटनेचे प्रकाश काणे, उमेश काटकर, अरूण भोजने, राजेश वाजे, लियाकत शहा, शिरीष काटकर, उदय ओतारी, राम रेडीज, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातु, तानू आंबेकर आदींनी पानगल्लीतील नाला १५ वर्षे साफ झाला नसून तो तातडीने साफ करावा, शहरातील गटारे, नाले हे पूर्वीच्या परिस्थितीनुसार असून त्यांची खोली, रुंदी वाढवावी करावी. नाले, पऱ्यांच्या जागा नगर पालिकेने मालकांकडून ताब्यात घ्याव्यात.
वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी असलेल्या यंत्रणेत वाढ करावी. शिवनदीतील गाळही काढावा, कामथे धरण गाळमुक्त करावे, गटारांमध्ये कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांसह नागरिकांना ५ हजार रुपये दंड करावा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गटार सुधारावे, पेठमापमधील नदीत आलेला गाळ हटवावा, शहरातील पोस्ट कार्यालय, कांगणेवाडी येथील गटारे मोठी करावीत, नदीकाठच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी आदी मागण्या केल्या.
परशुराम घाटाचे रडगाणे सुरूच असून, ते कायमच राहणार आहे. त्यामुळे धामणदेवीतून रस्ता काढा, अशी मागणी केली. त्यामुळे गुरूवारपासून नागरिकांनी सुचवलेल्या पर्यायांची मुख्याधिकारी भोसले हे आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांच्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांना बोलावून पाहणी करत आहेत.
१९ ठिकाणी संरक्षण भिंतींचा प्रस्ताव
बैठकीत पालिकेशी संबंधित प्रश्नांना उत्तरे देताना मुख्याधिकारी भोसले यांनी पुराबाबत कायमच्या उपाययोजना करण्यावर आम्ही भर देत आहोत. यातूनच वाशिष्ठी नदीला १९ ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यांचा १०६ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. गटारांच्या तुम्ही मांडलेल्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवल्या जातील. शहरातील ५२ नाले व गटारे साफ करण्यासांठी १९ पथके तयार करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या कामाला सुरुवात होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 05/Apr/2025














