अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा

रत्नागिरी : रोहा तालुक्यात वर्षभरापूर्वी झालेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी आता पोलिसांनी कठोर भूमिका घेत पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

रोहे तालुक्यातील तांबडी बौद्धवाडी येथे एका १६ वर्षीय मुलीचा विवाह मागील वर्षी १० मे २०२४ रोजी जबरदस्तीने लावण्यात आला होता. या घटनेनंतर पीडित मुलीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन २ मे २०२५ रोजी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीचे आई-वडील बबन बाबुराव जाधव आणि सविता बबन जाधव (रा. तांबडी बौद्धवाडी), तसेच मुलीचा पती प्रवीण संजय पवार (वय २२, रा. पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी), सासू संगीता संजय पवार आणि सासरे संजय आप्पा पवार (दोघेही रा. तरडगाव, फलटण-सातारा) यांच्याविरोधात बालविवाह लावणे आणि बालविवाहसहित बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबडी बौद्धवाडीतील १६ वर्षीय मुलीचा विवाह रत्नागिरी येथील प्रवीण संजय पवार याच्याशी झाला होता. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही दोन्हीकडील कुटुंबीयांनी हा विवाह लावून दिला. सध्या पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असून, तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बालविवाह रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 08-05-2025