राजापूरमधील धोकादायक इमारती हटविण्याचे पालिकेचे आदेश

रत्नागिरी : राजापूर शहरातील धोकादायक इमारती हटविण्याचे आदेश राजापूर पालिकेने बजावले आहेत.

राजापूर शहर बाजारपेठेत रस्त्यालगत काही जुन्या इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत.

यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासनाने संबंधित इमारत मालकांना नोटीसा बजावून धोकादायक इमारती हटविण्यास सांगितले होते. मात्र अद्यापही काही जीर्ण इमारती केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचा योग्य तो बंदोबस्त न केल्यास इमारत मालकांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

राजापूर शहर ब्रिटिशकालीन बंदर म्हणून प्रसिद्ध होते. आजही अनेक जुन्या इमारती राजापुरात आहेत. मात्र वर्षानुवर्षे अशा इमारतींमध्ये वास्तव्य नसल्याने काही इमारती जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जीर्ण इमारतींचा काही भाग कोसळण्याची घटनादेखील घडलेली आहे. राजापूर बाजारपेठेत दाटीवाटीने दुकाने वसलेली आहेत. त्यातच बाजारपेठेतील रस्त्यावर ग्राहकांसह शहरातील नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. अशावेळी या धोकादायक इमारतींमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी धोकादायक इमारत कोसळण्याची घटना घडल्यानंतर नगरपरिषद पशासनाने अशा इमारत मालकांना इमारत कोसळून घेण्याबाबतची नोटीसा बजावल्या होत्या. तसेच धोकादायक इमारती स्वतहून उतरवून न घेतल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र अद्यापही काही धोकादायक इमारती तशाच असून पालिका आता अशा धोकादायक इमारतींविरोधात निर्णायक टप्प्यावर आली आहे.

या वर्षाच्या पावसाळी हंगामामध्ये शहरातील धोकादायक इमारतींमुळे होणारी संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित मालकांनी धोकादायक इमारती तत्काळ हटवाव्यात. तसा धोकादायक झाडांचादेखील बंदोबस्त करावा, अन्यथा संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 12-05-2025