रत्नागिरी : अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीवर ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान

रत्नागिरी : आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासनातर्फे ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीवर ३५ टक्क्यांपर्यंत (कमाल दहा लाख) अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी आंबा पिकाची निवड करण्यात आली असून, या पिकावर आधारित उद्योग, व्यवसाय सुरू केले जात आहेत.

सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे हा योजनेचा हेतू आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी, नवउद्योजक, बेरोजगार युवक, महिला, वैयक्तिक मालकी/भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी कंपनी यासारखे लाभार्थी या योजनेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, अन्नधान्य, तृणधान्य यावर आधारित प्रक्रिया उत्पादने सुरू करता येतात. जिल्ह्यात या योजनेसाठी सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आंबा : एक जिल्हा, एक उत्पादन
रत्नागिरी जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत आंबा पिकाची निवड करण्यात आली आहे. आंबा पिकावर आधारित प्रक्रिया युनिट शेतकरी सुरू करू शकतात.

योजनेच्या अटी काय?
लाभार्थ्यांची प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित कर्ज घेण्याची तयारी असावी.

अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार, प्रोपायटर/भागीदारी प्रायव्हेट लिमिटेड असावा. वय १८ वर्षे तर एका कुटुंबातील एकच सदस्य असावा.

३५ टक्के अनुदान
वैयक्तिक मालकी/भागिदारी, शेतकरी उत्पादक संस्था यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के, जास्तीत जास्त दहा लाखांची रक्कम देय आहे.

अर्जदाराने एमआयएस पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर केल्यानंतर त्यावर जिल्हा संसाधन व्यक्तीतर्फे कार्यवाही केली जाते. बँकेव्दारे कर्ज दिले जाते. शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी

१७६ प्रस्ताव आतापर्यंत
जिल्ह्यात एकूण १७६ प्रस्तावांना परवागी देण्यात आली आहे आतापर्यत एक कोटी ४६ लाख ५७हजाराचे अनुदान वितरीत केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 17/Jun/2025