रत्नागिरी जिल्ह्यातील १६२ गावांना दरड कोसळण्याचा धोका

रत्नागिरी : कोकणातील दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या नव्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ६१७ गावे आता दरड धोक्याच्या छायेत आली आहेत.

कोकणात रायगडमधील ३९२, रत्नागिरीमधील १६२ तर सिंधुदुर्ग मधील ६३ गावांचा यात समावेश आहे. सन २००५, २०२१, २०२३ मध्ये मोठ्या दरड दुर्घटना घडल्या जात मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. या घटनांची गंभीर दखल घेऊन भूवैज्ञानिकांकडून संभाव्य दरड प्रवण गावांचे फेर सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात कोकणातील तीनही जिल्ह्यात दरडाप्रवण गावांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे, कोकणात प्रदेश हा प्रामुख्याने पर्वतमय आहे. या ठिकाणी अतिवृष्टीमोठ्या प्रमाणात होते. खडकांची रचना दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरते. या शिवाय हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो त्यामुळे दरडीचा धोका जास्त आहे.

कोकणातील बहुतांश रस्ते हे घाट माध्यावरून जातात. या रस्त्यांसाठी ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातात. कालांतराने या परिसरात सैल झालेले डोंगर, दगड गोटे कोसळण्यास सुरवात होते. त्यामुळे कोकणात रस्ते रेल्वे मार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. कमी वेळेत जास्त पाऊस झाला तर दरडप्रवण गावांना धोका वाढतो. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यात अनेक गावात दरड कोसळण्याची घटना घडते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पुणे विभागाकडून भूवैज्ञानिक मानांकनाच्या आधारे जिल्ह्याचा अभ्यास करण्यात आला असून, १६२ गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये १३ गावांचा जास्त धोकादायक तर जास्त ते मध्यम धोकादायक गावांमध्ये १४ गावांचा समावेश आहे. संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तालुक्यात सर्वाधिक धोकादायक गावांचा समावेश आहे. रत्नागिरी

चौपदरीकरणात डोंगर पोखरल्याचा परिणाम

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डोंगर पोखरले गेले. त्यामुळेपरिसरातील गावांना दरडींचा धोका निर्माण झाला आहे. इरशाळवाडी, तळीये सारख्या घटनानंतर यंत्रणा दरडीच्या आपत्तीच्या बाबतीत अधिक सजग झाल्या, त्यामुळे डोंगर माध्यांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक गावांचा शोध घेतला गेला पाहिजे तर धोकादायक गावांमध्ये प्रशासनाने स्थलांतराची तात्पुरती उपाययोजना करण्याबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजनेवर भर देणे आवश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अतिवृष्टीच्या काळात या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी भूस्खलनाच्या भागांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्कात राहून घडामोडींची माहिती दिली पाहिजे.

भूस्खलन म्हणजे काय ?

डोंगर कड्‌यावरून दरड किंवा खडक कोसळणे, जमीन खचणे अशा घटनांना आपण भूस्खलन म्हणतो. याचा वेग इतका असतो की त्याच्या प्रवाहात येणाऱ्या कोणत्याही वस्तू आपल्यासोबत घेऊन जाते. भूस्खलनाचा अंदाज लावणे हे सहज शक्य नसते. त्यामुळेच त्यावर तात्काळ उपाययोजना शक्य होत नाही. भूस्खलनाचे वहन, स्खलन, डोंगरकड्यावरून खडक कोसळणे असे अनेक प्रकार असतात. सावकाश होणाऱ्या स्खलनाचा अंदाज काढणे शक्य नसते.

अतिधोकादायक गावे

दापोली- पाजपंडी (श्रीराम मंदिर, पेलवणवाडी, पाचगाव), खेड-धामणंद पोसरे खुर्द, विर्माणी (वरचीवाडी), शेल्डी (पायरवाडी), उंबरवाडी, केळणे (भोसलेवाडी), चिपळूण गोवळकोट, संगमेश्वर ताम्हाणे, तामनाळे, लांजा-खोरनिनको मुस्लिमवाडी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 18-06-2025