Dapoli : हर्णे बंदरातील नव्या जेटीत गाळ साचल्याने वारंवार नौका रुतण्याच्या समस्येत वाढ

दापोली : कोकणातील मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकल्प राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्णे बंदरामध्ये तब्बल २५० कोटी रुपयांची नवी जेटी उभारण्याचे काम सुरू आहे; मात्र गेल्या आठ महिन्यांपासून हे काम ठप्प असून, स्थानिक मच्छीमारांच्या रोजच्या जलमार्गात अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

नवीन जेटीसाठी बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्यामुळे नौका थांबण्याच्या मुख्य चॅनलमध्ये गाळ साचत आहे. त्यामुळे मच्छीमारांना नौका उभ्या करणे आणि ये-जा करण्यामध्ये मोठी कसरत करावी लागत आहे. समुद्रातील भरती-ओहोटीच्या चक्रामुळे महिन्यात दोनवेळा अमावस्या आणि पौर्णिमेला मोठे उधाण येते; परंतु ओहोटीला या गाळात नौका अक्षरशः अडकून बसतात. एकदा नौका रुतली की, पुढील भरती येईपर्यंत ती हलवणे शक्य होत नाही. त्यामुळे मच्छीमारांना तत्काळ समुद्रात जाता येत नाही आणि रोजच्या मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. महिन्यात किमान आठ दिवस तरी या समस्येला मच्छीमारांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत.

हर्णे बंदर हे दापोली तालुक्याचे मुख्य आर्थिक केंद्र मानले जाते. येथे रोज कोटींच्या वर मासळीची उलाढाल होते; मात्र सध्या समुद्रात वाढलेल्या अवैध मासेमारीमुळे मासळीची आवक घटली आहे. त्यातच जेटीच्या कामामुळे निर्माण झालेल्या नव्या अडचणींमुळे मच्छीमारांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अवैध मासेमारीमुळे आधीच उत्पन्न घटले आहे. त्यात नौका रुतण्याच्या समस्येमुळे रोज नव्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने मच्छीमारांमध्ये संतापाची भावना आहे.

बंदरविकासाची गरज मान्य आहे; मात्र कामामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेत अडथळे निर्माण होऊ नयेत हीच मच्छीमारांची अपेक्षा आहे. बंदर विभागाने स्थानिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, गाळ काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. योग्य नियोजन आणि संवाद त झाला, तर विकासकामांमुळे समुद्रावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना त्रास होणार नाही, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

योगेश कदम यांची जेटीला भेट
१५ दिवसांपूर्वी दापोलीचे आमदार व राज्यमंत्री योगेश कदम यांनी जेटीच्या कामाची पाहणी करून जेटीचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच करा तसेच सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश दिले होते.

जेटीचे कामाला आमचा विरोध नाही; पण गाळ साचल्यामुळे नौका रुतून बसतात तेव्हा आमचे रोजचे आर्थिक नुकसान कोण भरून काढणार ? महिन्यात ८-८ दिवस समुद्रात जाता येत नाही. आधी अवैध मासेमारीची समस्या, त्यात आता ही अडचण अशा परिस्थितीत आम्ही या उद्योगात टिकून दाखवायचं तरी कसं ? यावर बंदरखात्याने स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कामकाज करावे– प्रकाश रघुवीर, उपाध्यक्ष हर्णे मच्छीमार बंदर कमिटी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 06/Dec/2025