रत्नागिरी: प्रशासकीय अनास्थेमुळे विकासकामांना कसा खोडा बसतो, याचे ज्वलंत उदाहरण रत्नागिरी तालुक्यातील नावाडी ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे. हायवेपासून संभाजीनगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता ११ मेपासून ‘आमरण उपोषणाचा’ इशारा दिला आहे.
रस्त्याची दुर्दशा आणि विद्यार्थ्यांचे हाल
संभाजीनगर येथील वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून रहिवासी राहत आहेत. विशेष म्हणजे, येथे १९६० पासून डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह कार्यरत असून, सुमारे ४० विद्यार्थी तिथे राहतात. या विद्यार्थ्यांसोबतच वृद्ध, आजारी व्यक्ती आणि अपंग नागरिकांनाही कच्च्या आणि मातीच्या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलमय होऊन पूर्णपणे बंद होतो, ज्यामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात.
१२ लाखांचा निधी कागदावरच?
ग्रामपंचायत रजिस्टर क्रमांक २३ मध्ये या रस्त्याची रीतसर नोंद करण्यात आली आहे. ‘जन सुविधा योजने’तून या रस्त्याच्या खडीकरणासाठी आणि डांबरीकरणासाठी १२ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र, निधी उपलब्ध असूनही प्रशासनाकडून या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेने याकडे कानाडोळा केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
११ मे पासून एल्गार
रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आकाश सुरेश कुऱ्हाडे आणि वसंत शांताराम शिंदे यांनी ११ मे रोजी रस्त्यावरच आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला महेंद्र जाधव, गणेश पवार, वहान दळवी, रमेश विटकर यांच्यासह संपूर्ण संभाजीनगरमधील ग्रामस्थांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
“रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न केल्यास, निर्माण होणाऱ्या कोणत्याही अप्रिय परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील,” असा कडक इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:06 21-04-2026














