गतवर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या घटली; संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात सर्वाधिक प्रादुर्भाव
रत्नागिरी: ‘Ratnagiri Dengue Malaria Cases’ (रत्नागिरी जिल्हा डेंग्यू मलेरिया रुग्णसंख्या) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत पावसाळी साथीच्या आजारांनी डोके वर काढले असले, तरी आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जानेवारी २०२६ ते जुलै आजअखेरपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण ११, तर मलेरियाचे ३६ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने वेळेत राबवलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी लक्षणीयरीत्या कमी आहे.
कोकणात जून महिन्यात काही दिवस दडी मारल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असून आतापर्यंत १२०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण व शहरी भागात सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज हजारो संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण संगमेश्वर व दापोली तालुक्यात, तर डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण संगमेश्वर तालुक्यात आढळले आहेत. सर्वात कमी रुग्ण संख्या मंडणगड तालुक्यात नोंदवली गेली आहे.
जानेवारी ते जुलै २०२६ दरम्यानची तालुकावार आकडेवारी:
| तालुका | मलेरिया रुग्ण | डेंग्यू रुग्ण |
|---|---|---|
| मंडणगड | ०० | ०१ |
| दापोली | ०८ | ०० |
| खेड | ०४ | ०० |
| गुहागर | ०२ | ०१ |
| चिपळूण | ०६ | ०० |
| संगमेश्वर | ०८ | ०५ |
| रत्नागिरी | ०४ | ०२ |
| लांजा | ०१ | ०१ |
| राजापूर | ०३ | ०१ |
| एकूण | ३६ | ११ |
जिल्हा परिषद आरोग्य सभापती विलास चाळके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यादरम्यान सातत्याने आरोग्य शिबिरे आणि धुरीकरण करण्यात येत आहे.
“रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत मलेरियाचे ३६ तर डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने वेळीच खबरदारी म्हणून उपाययोजना राबवल्यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची रुग्णसंख्या कमी आहे.” — संतोष यादव, जिल्हा हिवताप अधिकारी, रत्नागिरी.
आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून, डेंग्यू-मलेरियाचे डास स्वच्छ पाण्यात होत असल्याने आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्यास सांगितले आहे. घराभोवती पाणी साचू न देणे, पाणी उकळून पिणे आणि सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असल्यास त्वरित रक्ताची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 16-07-2026














