रत्नागिरी : लांजा तालुक्यातील रत्नागिरी पाणीपुरवठा योजनेंतर्गत काजळी नदीवर असोडे येथे कोल्हापूर पद्धतीच्या धरणाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. हे काम एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पदाधिकरी उपस्थित होते.
यावेळी येथील गावकर, सरपंच आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते धरणाचे भूमिपूजन करत असताना नारळ वाढवण्यात आला. यावेळेस किरण सामंत यांनी मार्गदर्शन करत असताना म्हणाले की, पंचक्रोशीतील गावांच्या पाण्याचा प्रश्न विचारात घेऊन या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे भूमिपूजन करत असताना मला मनापासून आनंद होत आहे. आपल्या पंचक्रोशीतील गावांच्या विकास कामासाठी भविष्यात एकही रुपया निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द यावेळेस आ. सामंत यांनी ग्रामस्थांना दिला. ते पुढे म्हणाले, या धरणामुळे पंचक्रोशीतील विहरींच्या पाण्याची पातळी वाढणार असून रत्नागिरी मधील होणाऱ्या सेमी कंडक्टर प्रोजेक्टच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे मार्गी लागणार आहे. भविष्यात लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघ उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेणार असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
हे धरण वर्षात पूर्ण होऊन याचा दर्जा हा चांगल्या पद्धतीचा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजू कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, सुभाष पवार, विवेक कांबळे, संतोष रेवाळे, महेश भाटवणेकर, सरपंच अर्चना कांबळे, गावकर दीपक गांगरकर, जयराम गांगरकर, शैलेश गांगरकर, इमरान पावस्कर, गुरु पवार, अभियंता बी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 26/Dec/2024














