आगामी दोन वर्षांत कोकणात रिफायनरी प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने हालचाली होऊ शकतात : अनय जोगळेकर

रत्नागिरी : जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार असेल तर उर्जेची मागणी वाढणार आहे. त्याकरिता खनिज तेल लागणार आहे. त्याकरिता रिफायनरीचा विचार पुढे आला. अमेरिका व सौदी अरेबियाच्या भागीदारीतून ही रिफायनरी येणार होती; परंतु २०१७ मध्ये नाणार येथे प्रकल्पाची सुरवात होणार होती, पण तेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव होऊन बायडेन विजयी झाले होते. आता पुन्हा अमेरिकेमध्ये ट्रंप निवडणुकीत विजय मिळवल्याने रिफायनरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत कोकणात रिफायनरी प्रकल्प आणण्याच्या दृष्टीने हालचाली होऊ शकतात, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पहिल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. राणी लक्ष्मीबाई सभागृहात या व्याख्यानाला भरपूर गर्दी झाली.

जोगळेकर म्हणाले की, राजकारणाला अर्थकारणाचे बळ लागतेच. त्याप्रमाणे ट्रंप यांच्या पक्षाला तेल उद्योगाचा पाठिंबा होता. त्यांचे जावई आशियात काम करत होते. त्यातूनच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीकडून रिफायनरीत गुंतवणुकीचे ठरले. या कंपनीने अमेरिकेतल्या शेअर बाजारात नोंदणी करावी व ५ टक्के शेअर विकून २ लाख कोटी डॉलर्स मिळवावेत. ते पैसे तेलउद्योगात म्हणजे भारतात रिफायनरीत गुंतवणूक करण्याचे ठरवले. पण आपण स्थानिक विषयाचा विचार करत राहतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करायला पाहिजे.

ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षांत जगात ६४ देशांत निवडणुका झाल्या. किमान सहा ते सात देश असे आहेत की जिथे या लष्कराने उठाव करून किंवा लष्कराच्या एका गटांनी प्रस्थापित लष्कराला गुंतवून सत्ता मिळवली. काही ठिकाणी हुकुमशाही उलथवून लावण्यात आली व काही देशांमध्ये परिवर्तन झाले. बांग्लादेशातील पंतप्रधानांना प्रचंड विजयानंतर काही महिन्यांत देश सोडून पलायन करावे लागले. भारताच्या तिन्ही बाजूंकडील देशात अराजकता आहे. काही भागांत बांग्लादेशी रोहिंग्यांची संख्या दिसू लागली आहे. त्यामुळे सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.

राणी लक्ष्मीबाई व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू झाला. सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी जोगळेकर यांचा सत्कार केला. ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे यांनी बाळशास्त्रींची इत्थंभूत माहिती दिली. व्यासपीठावर सौ. ऋचा जोशी व दिलीप ढवळे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 07/Jan/2025