राज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे : गृहराज्यमंत्री योगेश कदम

दापोली : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता आलेच पाहिजे. मराठीचा अवमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना युवानेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला. ठाणे-मुंब्रा येथे दोन दिवसांपूर्वी मराठी तरुणाला हिंदी भाषिकांकडून झालेल्या दादागिरीचा, धक्काबुकीचा उल्लेख करत शिवसेनेचे युवानेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

पत्रकार दिनी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना कदम म्हणाले, आपण सगळे भारताचे नागरिक आहोत, याची आम्हाला जाणीव आहे; पण महाराष्ट्रात राहताना आपल्याला मराठी बोलता आलेच पाहिजे. आम्ही जबरदस्ती करत नाही; पण तुम्ही प्रयत्न तर करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरव केला आहे, असा उल्लेख करत मोदी यांचे कदम यांनी कौतुक केले.

दापोली तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दापोली येथील पत्रकारांचा कदम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी शेवटच्या व्यक्तीचा आवाज बनून पत्रकार बांधवांनी निर्भिडपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच दापोली येथील पत्रकारांच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. आपण मंत्री म्हणून पत्रकारांसाठी सर्व सहकार्य करण्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 08/Jan/2025