राजापूर : मधमाशा व्यवसायाच्या जागृतीसाठी पाचलमध्ये पदयात्रा

राजापूर : मधमाशा पालन हा शेतीला पूरक व आर्थिक उत्पन्न देणारा एक चांगला व्यवसाय आहे. यातून महिला, बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांना गावातल्या गावात रोजगार उपलब्ध होणार आहे. आपण याचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचा पर्यायाने आपल्या गावाचा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राजापूर तालुक्यातील तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी यांनी केले.

मधमाशा पालनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यातून मधमाशा पालन व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने एका पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या समारोपाप्रसंगी त्या बोलत होत्या. खादी ग्रामोद्योग, ग्रामपंचायत तळवडे व पितांबारी समुहाने या पदयात्रेचे आयोजन केले होते. पितांबरी कंपनी ते तळवडे-पाचल अर्जुना नदी पुलादरम्यान काढण्यात आलेल्या पदयात्रेत ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले होते. खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी, पितांबरी समुहाचे आदित्य मुळ्ये, सुरेश गुडेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी माजी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, पितांबरी समुहाचे सुहास प्रभुदेसाई, तळवडे शाळा नं. १ व २ चे मुख्याध्यापक कुळकर्णी, अनाजी मासये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी आदी उपस्थित होते.

संवर्धनासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षण
तळवडे मधाचे गाव म्हणून प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आता लवकरच मधाचे गाव तयार करण्यासाठी मधमाशांचे संर्वधन करण्यासाठी युवक आणि महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर ग्रामस्थांना मधमाशा संर्वधनासाठी पेठ्या व अन्य साहित्य देण्यात येणार आहे.

तळवडे गावास ५४ लाख
खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव तयार केले जात आहे. त्यानुसार तळवडे गावाची मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे, तळवडे ग्रामसभेत तसा ठराव मंजूर केला आहे. मधाचे गाव जाहीर झालेल्या गावांना ५४ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 15/Jan/2025