हेवाळे बांबर्डेत हत्तींचा धुमाकूळ

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत हत्तीचा उपद्रव सुरूच आहे. हेवाळे बांबर्डे येथील शेतकरी विठ्ठल लक्ष्मण गवस यांच्या केळी व माड बागायतीचे बुधवारी (ता. २२) मध्यरात्री हत्तींनी नुकसान केले.

गेल्याच महिन्यात विठ्ठल गवस यांच्या शेती बागायतीत याच हत्तीनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हत्तींनी पुन्हा त्यांच्या बागायतीत दाखल होत नुकसान केली. एक टस्कर पहाटे ३ वाजेपर्यंत गवस यांच्या बागायतीत धुडगूस घालत होता. जवळपास दहा ते बारा माड व पत्रास केळींच्या त्याने नुकसान केले. मागच्या महिन्यातदेखील अशाच प्रकारे गवस यांच्या बागायतीचे त्यांनी नुकसान केले होते. वारंवार होत राहणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना समोर उभा राहिला आहे. कर्नाटकात ज्याप्रमाणे हत्ती पकड मोहीम राबविली गेली, त्याप्रमाणे दोडामार्गमध्ये का राबवित नाहीत, असा सवाल आता शेतकरी करीत आहेत.

त्यामुळे वनविभागाने या होणाऱ्या नुकसानीची जाणीवपूर्वक दखल घेऊन हत्तींचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 24/Jan/2025