अभिनेत्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे केले आवाहन
शिर्डी:
Nitesh Rane Statement मुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अभिनेता आमीर खान हा ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड अॅम्बेसेडर बनत असल्याचा थेट आरोप केला. हिंदू समाजातील तरुणांनी आमीर खानच्या चित्रपटांवर पूर्णपणे बहिष्कार टाकावा, असे आक्रमक आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अभिनेता आमीर खानने नुकत्याच केलेल्या तिसऱ्या लग्नाचा दाखला देत मंत्री नितेश राणे यांनी त्याच्या वैयक्तिक निर्णयांवर जाहीर टीका केली. जेव्हा मोठे सेलिब्रिटी आपल्या खासगी आयुष्यात असे निर्णय घेतात, तेव्हा त्याचा समाजावर आणि विशेषतः तरुण पिढीवर विपरीत परिणाम होतो, असे राणे यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर हिंदू समाजातील तरुणांनी आपला आदर्श कोण असावा, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपटांवर थेट बहिष्काराचे आवाहन
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी हिंदू तरुणांना विचार करण्याची विनंती केली आहे. नागरिक आणि तरुणांनी आता अत्यंत काळजीपूर्वक ठरवावे की त्यांनी नेमके कोणाचे चित्रपट पाहावेत आणि कोणाला आपला पाठिंबा द्यावा, असे सांगत त्यांनी थेट बहिष्काराची भूमिका मांडली. सेलिब्रिटींच्या अशा कृतींमुळे सामाजिक स्तरावर चुकीचा संदेश जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या या भूमिकेला राज्य सरकारमधील अन्य मंत्र्यांचेही समर्थन लाभले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नितेश राणे यांच्या या वक्तव्याची आणि भूमिकेची जोरदार पाठराखण केली असून, या मुद्द्याला राजकीय पाठबळ मिळाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 10-07-2026














