रत्नागिरी : बचत गटाच्या सीआरपींचे कामबंद आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी गुरुवारपासून उमेदच्या कर्मचारी तसेच महिला बचतगटाच्या सीआरपी महिलांनी कामबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील २ हजार ४०० सीआरपी महिला व ६८ कर्मचारी सहभागी झाले आहेत.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते. अभियानाच्या माध्यमातून तब्बल ३००० अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षापासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी मोर्चा काढला होता. तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षांपासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न केल्यामुळे जुलै महिन्यात आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात सर्वच पंचायत समितीमध्ये हे आंदोलन सुरू झाले आहे. जिल्हा परिषद भवनासमोर गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले आहे. यावेळी अय्याज पिरजादे, निकिता बोरकर, ऐश्वर्या विचारे, साक्षी वायंगणकर, नयना बोरकर, स्नेहल गावडे, अमेय राजेशिर्के, प्रणव कोळेकर, सुचिता शिंदे, धनश्री अबि, हेमंत मडवी, दीपक मोरे, परमवीर जेजुरकर, अंकिता चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांना आश्वासनाचा विसर
मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तब्बल अडीच महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 04/Oct/2024
