दापोली पंचायत समितीत जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास विलंब

गावतळे : ग्रामस्थांना शासकीय विविध कामासाठी लागणारे जन्म-मृत्यू दाखले दापोली पंचायत समितीमार्फत मिळण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. यापूर्वी दाखल्यांची नोंद नसेल तर तसे लेखी उत्तर मिळत होते व त्या आधारे दाखले मिळवण्यासाठी पुढील कामी त्याचा उपयोग होत होता; मात्र सध्या तेही दाखले देणे बंद झाल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे.

दाखल्यांविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अनेकवेळा दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला होता. या संदर्भात लेखी अर्ज करूनही ‘आज साहेब नाहीत, दाखले साहेबांच्या टेबलावर सहीसाठी आहेत, अजून टपालातून दाखले माझ्या टेबलवर आले नाहीत,’ अशी उत्तरे मिळत असल्याने ग्रामस्थांची दाखले मिळविण्यासाठी ससेहोलपट होत आहे. अनेकवेळा या टेबलावरचे कर्मचारी सुटीवर असल्यामुळे दाखले मिळण्यास दोन-दोन महिने लागत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

अनेकवेळा दाखले शोध कामी टाळाटाळ होत असल्यामुळे बहुतांशी लोकांना कार्यालयात नोंद मिळत नाही, असे उत्तर देऊन हात वर केले जातात. काही कर्मचाऱ्यांनी आता निकाली उत्तरही द्यायचे नाही, असा शासननिर्णय आल्याचे सांगितले.

त्यामुळे दाखले मिळवायचे कसे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. एकीकडे शंभर दिवस उपक्रम शासन राबवत असतानाच दाखल्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याने ही मोहीम नक्की कुणासाठी, यावरून चर्चा रंगली आहे. दापोली पंचायत समितीमधील हा गोंधळ सोडविण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या पंचायत समितीत प्रशासकीय कारभार सुरू असल्याने याबाबत त्यांना जाब विचारणारे लोकप्रतिनिधीही नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.

जन्म-मृत्यू दाखले हे साहाय्यक गटविकास अधिकारी याच्या सहीने देतो; पण जेथे नोंदी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी दाखले देण्यास अडचण येत आहे. ५०० पेक्षा जास्त दाखले तयार आहेत; पण अजूनही कोणी ते न्यायला आले नाहीत. इथून पुढे गैरसोय होणार नाही, याची दखल घेऊ – गणेश मंडलिक, गटविकास अधिकारी, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:40 PM 05/Apr/2025