चिपळूण : उन्हाळ्यात वाशिष्ठी नदीकिनारी मगरींचा वावर वाढला आहे. त्यामुळे नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्यांना मगरींचा धोका वाढू लागला आहे. या मगरींपासून आता पोहणाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. मागील पाच वर्षात मगरींनी माणसावर किरकोळ हल्ले केले आहेत.
जमिनीत पुरलेल्या अंड्यांचे रक्षण करताना समोरून येणाऱ्या माणसाच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत.
तळ्यांचे शहर म्हणून चिपळूण शहराची जशी ओळख आहे तशीच मगरीचे शहर म्हणूनही ओळख आहे: मात्र, जशा शहरातील तळी संपल्या तसा मगरींचा अधिवासही कमी झाला. अलीकडे वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना पाणथळ जागा नष्ट केल्यामुळे मगरीचा अधिवासही कमी झाला आहे. अनेक वेळा शहरातील नाल्यात तर मोकळ्या रस्त्यांवर मगरी आढळल्या आहेत. सध्या सकाळी आणि दुपारी उन्हाळा असे वातावरण आहे.
त्यामुळे मगरी वाशिष्ठी नदीकिनारी वावरताना दिसतात, पेठमाप भागातील नदीकिनारी बुधवारी मंगरौला वावर तेथील नागरिकांना दिसू आली. तेथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणानी मगरी पाहून तेथून पळ काढला मगरीच्या प्रजननाचा हंगाम सुरू असल्याने त्या आक्रमक असतात. मगर जमिनीवर माती उकरून अंडी घालते व घरट्याचे संगोपन करते. एक-दीड महिन्यांत घरट्यातील अंड्यांतून मगरीची पिले जन्मतात. अन्नासाठी ती पाण्यात उतरतात. मगर पिल्लांना शिकार करून अन्न भरवत नाही तर मगरीची लहान पिल्ले पाण्यात उतरून कीटक व लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरीला रोजचे खाद्य फार कमी प्रमाणात लागत असल्याने त्या इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून साठवून ठेवत नाहीत.
म्हणूनच मगर मोठ्या प्राण्यांची शिकार करत नाही. मागील पाच वर्षांत मगरीने माणसाची शिकार केल्याची किंवा हल्ला केल्याची घटना नाही; मात्र नदीकिनारी मातीत असलेल्या अंड्यांचे रक्षण करताना मगर अनेकवेळा नागरिकांच्या अंगावर आल्याची घटना यापूर्वी घडली आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये मगरी अंडी घालतात. ज्या ठिकाणी पाण्यात अंडी घालतात त्या परिसरात कोणी येणार नाही, याची त्या दक्षता घेत असतात.
मगरी माणसावर फार हल्ले करत नाहीत; मात्र लहान मुलांवर हल्ले करतात. त्यामुळे नदीत पोहण्यासाठी जाताना तहान मुलांना कोणीही एकटे सोडू नका. शक्यतो ज्या भागात मगरींचे वास्तव्य आहे त्या भागात जाणे टाळावे – अमय गोडबोले, वनप्रेमी, चिपळूण
येथे आढळतात मगरी
गोवळकोट खाडीकिनारी, नाईक कंपनी पूल, मुरादपूर, शंकरवाडी, खाटीकआळी, बाजार पेठेतील पुले, शिवनदीवरील पूल, गोवळकोट रोड परिसरातील नदी, नारायण तलाव, वीरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव आदी परिसर
कोणती काळजी घ्यावी ?
खोल पाण्यात उतरताना, कपडे धुताना, पोहताना, काठालाच पाण्यात उतरून अंघोळ करताना, खोल पाण्यात, पाण्याजवळ जनावरे घेऊन जाणे टाळा. मगरीचा वावर दिसल्यास पाण्यात जाऊच नका. जनावरांना पाणी पाजताना काठावर उथळ जागेत जा. खोल पाण्यात उतरून कपडे धुणे टाळा. तसेच लहान मुलांना जपा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 17/Apr/2025














