गुहागर : शासनाकडून एक महत्वकांक्षी योजना म्हणून राबविली जात असलेल्या जलजीवन योजनेचा तालुक्यातील अनेक ठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मनसे आक्रमक भूमिका धारण करेल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाची जलजीवन योजना अद्याप जिथेच्या तिथेच आहे. गुहागर तालुक्यात बहुतांशी ठिकाणी ही कामे अपूर्णच आहेत. या विषयासंबंधीत पाणीपुरवठा अधिका याकडे आम्ही पत्रव्यवहार केला होता. मात्र अदयाप कार्यवाही झालेली नाही जनतेच्या पत्रव्यवहारांकडे प्रशासनाकडून जाणून बुजून कानाडोळा केला जात आहे. सदर योजनेच्या ठेकेदारांवर आपण कोणती कार्यवाही केली याची माहिती मिळावी.
यामध्ये पुढे म्हटले आहे की, ठेकेदारांनी फक्त पाईप टाकुन आपली बिलं काढून घेतली परंतु काम अर्धवटच आहे. तसेच ठेकेदारांनी टाकलेली पाईपलाईन तशीच पडून राहते आणि शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे ठेकेदारांनी पाण्याचा स्त्रोत तपासणे गरजेचे आहे. या प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या जात आहेत. याप्रकरणी आपण वेळेत लक्ष न दिल्यास मनसे आक्रमक भूमिका धारण करेल याची नोंद घ्यावी असा इशाराही या निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 02/May/2025














