साखरपा : ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या मानधनात तीन हजारांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी राज्यशासनाने ३३६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो परिचालकांना फायदा होणार आहे तसेच या निर्णयामुळे संगणक परिचालकांचा ग्रामपंचायतींच्या आकृतीबंधात सामावेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. अवघ्या सात हजार एवढ्या तुटपुंज्या मानधनावर हे परिचालक कार्यरत आहेत, याची कल्पना देऊन मानधनवाढ व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला आणि त्यावर काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. संगणक परिचालकांच्या मानधनासाठी तरतूद करण्यात आली आहे. हे मानधन आतापर्यंत ठेकेदार कंपनीकडून मिळत होते; पण यापुढे हे मानधन थेट शासन निधीतून मिळणार आहे. दर महिन्याला निश्चित तारखेला ते परिचालकांच्या बँकखात्यात जमा होईल. महिन्याला देण्यात आलेले लक्ष्यही ठेवले जाणार नाही. या निर्णयामुळे संगणक परिचालकांचा ग्रामपंचायतींच्या आकृतीबंधात समावेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. संगणक परिचालक हे पद ग्रामपंचायतीत निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांनी दाखवलेल्या सकारात्मकतेबाबत संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 12-10-2024
