chiplun : चिपळुणात २३ घाटांवर निर्माल्य संकलन

चिपळूण : शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी पालिकेने निर्माल्य संकलन हा उपक्रम हाती घेतला आहे. गणेश मंडळांमधून पूजेनंतर उरलेले निर्माल्य संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाईल. यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील २३ विसर्जन घाटावर पालिकेने विशेष व्यवस्था केली आहे.

गणेशोत्सव काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकले जाते. जलप्रदूषण होऊ नये यासाठी पालिकेने या समस्येवर उपाय म्हणून निर्माल्य संकलनाची योजना आखली आहे. संकलित निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून, त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाईल. हे खत शहरातील उद्याने, ऑक्सिजन पार्क आणि वृक्षारोपण मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे. मागील काही वर्ष पालिका हा उपक्रम राबवत आहे. पालिकेच्या या खताला सरकारकडून अधिकृत ब्रँड मिळाले आहे. पालिका या खताची विक्रीही करू शकते; परंतु तेवढ्या प्रमाणात खत तयार होत नसल्यामुळे सध्या केवळ शहरातील उद्यानामध्ये त्याचा वापर केला जात आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून निर्माल्य संकलनासाठी जनजागृती सुरू केली आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून निर्माल्य संकलनाचे महत्त्व पटवून निर्माल्य तलाव, नदीत न टाकता पालिकेच्या निर्माल्य कळसांमध्ये द्यावे, असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.

यावर्षी निर्माल्यापासून बायोकम्पोस्टिंग पद्धतीने खत तयार केले जाणार आहे. दीड दिवसाचे गणेश विसर्जन झाले तेव्हा नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता पालिकेकडे दिले. निर्माल्यांतील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्लास्टिक, थर्माकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा कमी झाले आहे. दहा दिवसांचे गणेश विसर्जन होईपर्यंत कमीत कमी चार टन निर्माल्य गोळा होईल आणि त्यातून खतनिर्मिती केली जाईल. पालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला गणेशभक्तांनी पाठिंबा द्यावा-सुजित जाधव, निरीक्षक, चिपळूण पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:31 PM 01-Sep-2025