रत्नागिरी:
रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंत यांनी हा राजीनामा सोपवला. रवींद्र चव्हाण आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
राजीनाम्यामागचे ‘धर्मसंकट’ आणि राजकीय चर्चा
राजेश सावंत यांच्या राजीनाम्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे मोठे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेला बळ देणारी महत्त्वाची बाब म्हणजे राजेश सावंत यांची कन्या शिवानी माने या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, शिवानी माने या उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते बाळ माने यांच्या सून आहेत.
हे आहे मोठे कारण:
- जर राजेश सावंत भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले असते, तर त्यांना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागला असता.
- याचा अर्थ, त्यांना थेट स्वतःच्या कन्येच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ आली असती.
या धर्मसंकटातून बाहेर पडण्यासाठी आणि कौटुंबिक व राजकीय संघर्षाची वेळ टाळण्यासाठी राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा त्याग केल्याचे बोलले जात आहे.
पुढे काय? कुणाचा प्रचार करणार सावंत?
राजीनामा दिल्यानंतर आता राजेश सावंत भाजपमध्ये राहून नेमका कुणाचा प्रचार करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एका बाजूला पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, तर दुसऱ्या बाजूला कन्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 05-11-2025














