Dapoli UBT |दापोलीत पाणीपट्टी, करवाढीचा प्रस्ताव; ठाकरे शिवसेनेकडून निषेध

दापोली : दापोली शहरात भरपूर पाऊस असतानाही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. शहरातील अनेक वॉर्डमध्ये नागरिकांना चार दिवसांच्या अंतराने पाणी मिळत होते. अशा परिस्थितीत नगरपंचायतीने पाणीपट्टी वाढ, जन्म-मृत्यू दाखल्यांचे दरवाढ, नगरकरातील वाढ यांचा प्रस्ताव मांडला असून, हा निर्णय पूर्णपणे जनविरोधी असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, दापोलीकरांना भरपावसातही पाणी मिळाले नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन, साठवण व व्यवस्थापन याकडे नगरपंचायतीकडून दुर्लक्ष झाले तरीही करवाढ लादून नागरिकांना आर्थिक झळ देण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. पूर्वी ३० रुपयांना मिळणारा जन्म व मृत्यू दाखला आता थेट १०० रुपये झाला. नवजात बाळापासून ते मृत व्यक्तीपर्यंत करवाढ लादून नगरपंचायत नागरिकांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भार टाकत आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापनात झालेली ढिलाई आणि पावसातही पाणी न देण्याची वेळ आल्याबद्दलही शिवसेनेने प्रशासनावर टीका केली. पाच-पाच महिन्यांपासून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. एकीकडे शहर विकास ठप्प आहे आणि दुसरीकडे कर वाढीचे ओझे वाढवले जात आहे, असा आरोप गुजर यांनी केला.

यावेळी शिवसेनेने नगराध्यक्ष आणि सत्ताधारी सदस्यांनी कर वाढीला पाठिंबा दिला आहे का? याची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि विरोध उभारण्यासाठी घरोघर मोहीम तसेच जर ठराव मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दिला आहे. यावेळी शहरप्रमुख संदीप चव्हाण, सचिव नरेंद्र करमरकर, माजी नगराध्यक्ष ममता मोरे जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 06/Nov/2025