चिपळूण : तालुक्यातील तळवडे येथे अनोळखीने लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा होत आहे. या गावात इंटरनेटची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षण, आरोग्य, बँकिंग, सरकारी सेवा अशा प्रत्येक बाबतीत इंटरनेट अत्यावश्यक असतानाही एकाही टेलिकॉम कंपनीचा येथे मोबाईल टॉवर उपलब्ध नाही. त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने फलकाच्या रूपाने उमटले आहेत.
बॅनरवरील मजकूर ‘पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये, आमच्या भावना समजून घ्या… नेट द्या, मत घ्या, ‘असा स्पष्ट संदेश देतो. या खाली तळवडे गाव म्हणतंय, आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच, असेही म्हटले आहे. सध्या निवडणुकांचा काळ सुरू असल्याने अनेक राजकीय पुढारी गावभेटी घेत आहेत. गावातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार यांना इंटरनेटच्या अभावामुळे दररोज समस्या भोगाव्या लागतात. काही अत्यावश्यक माहिती पोहोचवणे खूप अडचणी येत आहेत.
ऑनलाईन शिक्षण, शासनाच्या योजना, बँक व्यवहार, रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टींसाठी इंटरनेट आवश्यक असतानाही गावात आजही डिजिटल अंध:कार आहे. हा बॅनर कोणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून, स्थानिक पातळीवर यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॅनरबाबत तळवडे सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 19/Nov/2025














