Maharashtra Weather Alert: राज्यातील तापमान किंचित घटणार; ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असताना आता वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भात मंगळवार, बुधवार व गुरुवारी पाऊस कोसळेल, तर उर्वरित राज्यातील कमाल तापमान किंचित घटेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

अमरावतीत सोमवारी सर्वाधिक ४६.६ अंश तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात १ मेपर्वी पुन्हा पश्चिमेकडील वारे सक्रिय होत आहेत. त्यामुळे तापमानात घट होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.

मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ पर्यंत घटेल. मराठवाड्यात तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहील. खानदेश आणि विदर्भात तापमान ४० पर्यंत घसरण्याची शक्यता.

या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज आहे.

१ मेपर्यंत वादळांची शक्यता
उत्तर भारतापासून पूर्वोत्तर राज्यांपर्यंत तसेच हिमालयीन भागात १ मेपर्यंत प्री-मॉन्सून वादळांची (थंडरस्टॉर्म्स) शक्यता आहे. या भागांमध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 28-04-2026