Ratnagiri Heavy Rain: रत्नागिरीत मुसळधार पावसाचा कहर; ६ तालुक्यांत पूरस्थिती; प्रशासनाचा हायअलर्ट, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

रत्नागिरी:

Ratnagiri Heavy Rain म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी दाणादाण उडवून दिली. दापोली, खेड, चिपळूण, राजापूर, मंडणगड आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक प्रमुख रस्ते जलमय झाले असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली असून विविध घाटमार्गांवर दरडी कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव सतर्कतेचा इशारा दिला असून स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा गतिमान केली आहे.

पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे; प्रशासनाचा हायअलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास अत्यंत संवेदनशील असणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली असून पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतराची आणि मदतीची पूर्वतयारी करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत चालू हंगामात पावसाची टक्केवारी कमीच

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरस्थिती उद्भवली असली, तरी चालू हंगामातील एकूण पावसाची आकडेवारी पाहता चिंता कायम आहे. गेल्या वर्षी ५ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५३.५७ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा याच कालावधीत केवळ ३४.६५ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांतील पाऊस तीव्र असला, तरी हंगामाच्या एकूण सरासरी पर्जन्यमानात अद्याप घट असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते.

२४ तासांत राजापूर आणि दापोलीमध्ये सर्वाधिक नोंद

गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाचा जोर सारखा नव्हता. दक्षिण आणि उत्तर भागातील काही तालुक्यांना पावसाने अधिक झोडपले. यामध्ये राजापूर तालुक्यात सर्वाधिक १५५.०० मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याखालोखाल दापोलीत १४९.४२ मिमी पाऊस पडला.

जिल्ह्यातील २४ तासांतील तालुकानिहाय अधिकृत पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

तालुकापाऊस (मिमी मध्ये)
राजापूर१५५.००
दापोली१४९.४२
मंडणगड१३२.२५
चिपळूण१३०.७७
खेड१२५.४२
लांजा८७.८०
संगमेश्वर७९.९१
गुहागर७१.४०
रत्नागिरी५२.७७

जिल्ह्यात एकूण ९८४.७४ मिमी पावसाची नोंद झाली असून, २४ तासांतील सरासरी पर्जन्यमान १०९.४२ मिमी इतके राहिले आहे. पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 06-07-2026