पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान
रत्नागिरी:
रत्नागिरी जवळील खंडाळा परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच देवरुखमध्येही सलग तीन घरे फोडल्याची घटना ताजी असताना, आता खंडाळा परिसरात घरफोड्यांची मालिका सुरू झाल्याने स्थानिक कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
१३ हजारांच्या सोन्याच्या नाण्यासह इतर ठिकाणी डल्ला
वाटद खंडाळा येथील रहिवासी राकेश शशिकांत पवार (वय ४०) यांनी जयगड पोलीस ठाण्यात दिलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, १२ जुलै रोजी रात्री १० ते १३ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला आणि गोदरेज कपाटातील सुमारे १३ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरून नेले.
या चोरीची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादींनी परिसरात चौकशी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली. याच परिसरात असणाऱ्या आदर्श नगर येथील शुभम श्रीकांत महाडीक यांचे बंद घर (जे मुंबईला गेल्यामुळे बंद होते), श्रीराम नगर येथील मंदार श्रीकांत बारगुडे यांच्या बिअर शॉपीचे गोडाऊन आणि परेश चंद्रकांत गुरव यांचे बंद घर देखील चोरट्यांनी याच रात्री फोडल्याचे उघड झाले. एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची खात्री पटताच नागरिकांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.
जयगड पोलिसांकडून तपास सुरू; गस्त वाढवण्याची मागणी
या सर्व धाडसी घरफोड्यांची रीतसर नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा व जयगड पोलीस करत आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
देवरुख पाठोपाठ आता रत्नागिरीच्या ग्रामीण भागातही चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे पोलिसांसमोर या टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. घरफोड्यांच्या या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी आपापल्या भागात गस्त वाढवावी, कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले जात आहे. तसेच, पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक प्रभावी करून चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 14-07-2026














