नाचणे, खेडशी, शिरगाव, भाट्ये व कुवारबाव ग्रामपंचायतींवरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पाऊल; अंतिम मंजुरीसाठी ठराव जिल्हा परिषदेकडे पाठवणार
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरालगतच्या ग्रामीण भागांत वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी रत्नागिरी पंचायत समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन इमारती उभारताना पिण्याच्या पाण्याची सोय आणि सांडपाणी व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित बिल्डरांनीच (विकासकांनी) घेण्याचा ठराव पंचायत समितीच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींवरील वाढता ताण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे प्रदूषण
रत्नागिरी पंचायत समितीच्या पार पडलेल्या बैठकीत सभापती प्रवीण पांचाळ यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती दिली.
- पाण्याचा तुटवडा: रत्नागिरीनजीकच्या नाचणे, खेडशी, शिरगाव, भाट्ये आणि कुवारबाव या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे स्थानिक पाण्याच्या स्रोतांवर प्रचंड ताण येऊन पाण्याची पाणीटंचाई निर्माण होत आहे.
- योजनांवर मर्यादा: अशा वेळी नवीन इमारतींना नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी देणे स्थानिक ग्रामपंचायतींना अशक्य होत चालले आहे.
- सांडपाण्याची समस्या: इमारतींमधील सांडपाण्यामुळे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होत असल्याचेही बैठकीत समोर आले.
या सर्व पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सोय आणि सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी बिल्डरांनीच पार पाडावी, असा ठराव संमत करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवला जाणार असल्याचे सभापती पांचाळ यांनी स्पष्ट केले.
पोषण आहाराबाबतही दिले निर्देश
याच बैठकीत सभापती प्रवीण पांचाळ यांनी शाळांमधील पोषण आहाराची मुदत तपासून घेण्याचे आणि विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर धान्यपुरवठा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपसभापती गजानन धनावडे यांच्यासह पंचायत समितीचे विविध अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 27-08-2026














