पुस्तके नेहमीच अनुभूती आणि प्रेरणा देतात : डॉ. निधी पटवर्धन

रत्नागिरी : वाचनाला कशाचेही बंधन असत नाही आणि पुस्तके नेहमीच अनुभूती आणि प्रेरणा देतात, असे प्रतिपादन प्राध्यापिका आणि लेखिका डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे औचित्य साधून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (कै.) बाबूराव जोशी ग्रंथालयात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात प्राध्यापिका आणि लेखिका डॉ. पटवर्धन यांनी ‘वाचन आणि लेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. पटवर्धन यांनी वाचनाच्या वाटचालीचा आढावा घेतला. लहानपणी केलेले वाचन, विद्यार्थिदशेत केलेले आणि नंतर केलेले वाचन हळूहळू कसे आनंदी ठरत जाते ते त्यांनी सांगितले. वयानुसार वाचनाची गरज कशी बदलते ते सांगून मुखोद्गत ते मुद्रणकला येईपर्यंतचा लेखनाचा प्रवास सांगितला. लेखकांना आपण पत्रे पाठवली पाहिजेत, जेणेकरून आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. ‘वाचन गुरू’ म्हणजे वाचन कसे आणि कोणते करावे, हा मंत्र देणारी व्यक्ती भेटणे खूप महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. संयुक्ता शेट्ये, प्रा. मधुरा शिंदे आणि ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते. वाचनविषयक उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 11-01-2025