सचोटीने काम करत ज्येष्ठ वकिलांचा वारसा जपूया : न्यायमूर्ती माधव जामदार

रत्नागिरी : वकिली, उलटतपासणी हे वकिलांचे काम आहे; पण वकिली हा उद्योग नाही. नवनवीन अशील येत असतात; परंतु आपण कशा पद्धतीने काम करतोय याकडे लक्ष दिले पाहिजे, वकिलीचे काम सचोटीने केले पाहिजे. रत्नागिरीतील ज्येष्ठ वकिलांची स्मृती ठेवून वारसा जपला पाहिजे. त्यांनी सचोटीने केलेले काम आपण शिकले पाहिजे. त्यांची तैलचित्रे नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पालक तथा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.

जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये बार असोसिएशनच्या नव्या हॉलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी रत्नागिरीतील नामवंत वकील स्व. बापूसाहेब परूळेकर, स्व. केतन घाग, स्व. मुसा डिंगणकर आणि स्व. नारायण तथा नाना गवाणकर यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जामदार यांनी केले. कार्यक्रमाला मंचावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, ज्येष्ठ वकील फजल डिंगणकर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या वेळी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. जय जय महाराष्ट्र माझा, या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. न्या. जामदार म्हणाले, आज ज्यांच्या तैलचित्रांचे अनावरण केले त्या सर्वांना मी जवळून ओळखत होतो. पालक न्यायाधीश म्हणून पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करत आहे.

वकीलवर्गाच्या चांगल्या योगदानामुळे न्यायिक कामही चांगल्याप्रकारे चालू आहे. सर्व बार असोसिएशनला कॉम्प्युटर, प्रिंटर दिले. या नव्या हॉलसाठीही तातडीने निर्णय घेतला. पालकमंत्र्यांनीही याकरिता निधी वितरित केला. आज ते साहित्य संमेलनामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

प्रास्ताविकामध्ये अॅड. विलास पाटणे म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी हॉलसाठी ३० लाख रुपये मंजूर केले आणि वर्षभरातच काम पूर्ण झाले आहे. यापुढेही बार असोसिएशनच्या मागण्याही मान्य करू, असे त्यांनी सांगितले आहे. तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम माझ्या आयुष्यात सर्वांत अविस्मरणीय आहे. या प्रसंगी अॅड. बाबा परूळेकर, अॅड. जी. एन. गवाणकर, अँड. डिंगणकर आणि अॅड. संकेत घाग यांनी मनोगतामध्ये तैलचित्र लावलेल्या चारही दिग्गजांचे अनुभव, आठवणी थोडक्यात सांगितल्या, सचिव अॅड. रत्नदीप चाचले यांनी सूत्रसंचालन केले.

छत्रपती शिवाजी महाराज शौर्याचं प्रतीक
आजचा दिवस चांगला आहे म्हणजे शिवाजी महाराज यांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचं केंद्र आहे. हा जनतेचा राजा आहे. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सर्वांनी स्फूर्ती घेतली पाहिजे, असे न्या. माधव जामदार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 20/Feb/2025