रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय (महाराष्ट्र राज्य, मुंबई) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने २२ आणि २३ फेब्रुवारी या कालावधीत ‘रत्नागिरी ग्रंथोत्सव २०२४’चे आयोजन शासकीय विभागीय ग्रंथालय येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या साहित्यिकांच्या मांदियाळीमध्ये विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक व विक्रेते यांची ग्रंथ दालने लावण्यात येणार आहेत.
ग्रंथ प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ही ग्रंथ दिंडी जीजीपीएस हायस्कूल येथून निघणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय, जयस्तंभ येथे समाप्त येईल. या दिंडीत मान्यवर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत.
२२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता “गोडी वाचनाची नव्या पुस्तकांची” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून राजापूर तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक मदन हजेरी व डीजीके महाविद्यालयाच्या सह प्राध्यापक वसुंधरा जाधव हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता “माझे संविधान माझा अभिमान” या विषयावर चर्चासत्र होईल. यात कायदा विषयावरील तज्ज्ञ जिल्हा कोषागार अधिकारी, प्रवींद बिरादार व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेश पाटील हे सहभागी होतील.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता “मराठी राज्य भाषा चला ज्ञान भाषा करू” या विषयावर मराठी भाषा प्रेमी वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी परिसंवाद होईल. या सत्रामध्ये जिल्हा परिषद शाळा, कोळंबेचे मुख्याध्यापक डॉ. सदानंद आग्रे, आणि स्वामी स्वरूपानंद विद्यालय, पावसच्या सह अध्यापिका शीतल सामंत सहभागी होतील. दुपारी २.३० वाजता निमंत्रित कवींचे काव्य संमेलन व त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ कवयित्री सुनेत्रा जोशी या काव्य संमेलन व समारोपाचे अध्यक्षस्थानी आहेत.
रत्नागिरी ग्रंथोत्सव २०२४ कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रंथ प्रेमी, वाचक प्रेमी, अभ्यासक, संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री स्टॉल आणि विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 21/Feb/2025
