रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर नेमलेल्या ५०० कंत्राटी शिक्षकांना पाच महिने उलटले तरी मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
रिक्त पदांची कसर भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने मागील वर्षी ७०० तात्पुरते शिक्षक भरले होते. मात्र, पवित्र पोर्टलवरून भरती झाल्यानंतर त्या शिक्षकांना कमी केले होते. दरम्यान, रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे ५०० कंत्राटी शिक्षकांची भरती केली होती. मात्र, त्या कंत्राटी शिक्षकांना एक रुपयाही मानधन दिलेले नाही.
जिल्हा परिषदेने या कंत्राटी शिक्षकांची महिन्याला १५ हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर नियुक्ती केली आहे. त्या मानधनापैकी गेले पाच महिने एक रुपयाही शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे शासन डी.एड. धारकांची थट्टा करत असल्याचा आरोप शिक्षक करत आहेत. एकीकडे काम करुनही कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत संधी मिळत नाही, त्यात कंत्राटी कामाचेही पैसे वेळेत मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.
वारंवार पाठपुरावा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर जिल्हा परिषदेने स्थानिक डी. एड. धारकांच्या कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त्या केल्या. या शिक्षकांना ऑक्टोबर, २०२४ पासून अद्यापही मानधन दिलेले नाही. त्यासाठी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे ते पाठपुरावा करीत आहे.
मानधनाची मागणी
या कंत्राटी शिक्षकांचे मानधन देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही शासनाकडून त्यांच्या मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेला आलेली नाही. त्यामुळे या कंत्राटी शिक्षकांना अद्याप मानधन मिळालेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 27/Feb/2025














