रत्नागिरी पोलीस दलामार्फत ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन’

रत्नागिरी : मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या “७ कलमी कृती कार्यक्रम” नुसार सर्व पोलीस घटकांना नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत दिनांक ०३/०३/२०२५ रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितित पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन’ चे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्ष, येथील “भरोसा सेल” येथे प्राप्त एकूण ०७ अर्जा मधील अर्जदार व गैर अर्जदारांना अर्ज चौकशी करिता बोलावण्यात आले होते.

या अर्ज चौकशीकरिता एकूण ०५ पॅनल नेमण्यात आलेले होते ज्यामध्ये एकूण ०५ पोलीस अधिकारी, ०७ महिला पोलीस अंमलदार, ०५ भरोसा सेल व महिला सुरक्षा समितीचे आशासकीय सदस्य यांचा समावेश होता. या पॅनल मार्फत अर्जदार व गैर अर्जदार यांना समुपदेशन करून अर्जदार व गैर अर्जदार यांच्या कौटुंबिक स्तरावरील प्राप्त तक्रारीबाबत योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यामधील वाद-विवाद मिटविण्यात यश आलेले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी उपस्थित अर्जदार व गैर अर्जदार यांना कौटुंबिक वाद व त्यातून होणारे परिणाम याबाबत अधिक मार्गदर्शन केले.या जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने एकूण ५० अर्जदार व गैरअर्जदार असे उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्षास मागील पाच वर्षांमध्ये एकूण ५४८ तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील ५४७ अर्जाचे निरसण करण्यात आले आहे व एका अर्जामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 04/Mar/2025