रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल. चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ५० लाखांचा दंड केला असून, आराखडा बनवणाऱ्या अभियंत्याला २० लाखांचा दंड केला आहे. जानेवारी २०२६ अखेर हा पूल पूर्ण होईल. या महामार्गाच्या दर्जाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत; परंतु दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही तरी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
गेली चौदा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत गुहागरचे ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना भोसले म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला २०११ पासून सुरू झाली. मी स्वतः या मार्गाची पाहणी केली; परंतु व्हॅनिटी वाहनाचा वापर केला नाही. चिपळूणच्या पुलाचे काम ५० टक्के झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करत आहे. गर्डरचे काम जानेवारी २०२६ अखेर पूर्ण केले जाईल, याची सभागृहाला खात्री देतो. गर्डर कोसळल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत चौकशी सुरू आहे; परंतु आपण ठेकेदारावर कारवाई केली आहे.
भास्कर जाधव म्हणाले, यापूर्वीचे प्रश्न-उत्तर काढून बघा. प्रत्येक डिसेंबरपर्यंत महामार्ग पूर्ण होण्याच्या तारखा दिल्या आहेत. १६ ऑक्टोबर २०२३ ला चिपळूण येथील पुलावरील गर्डर कोसळला. दोन वर्षे व्हायला आली अजून तेथे काम सुरू नाही. रडतखडत काम केले जात आहे. मी सांगतो पुढील चार वर्षे अजून हा रस्ता पूर्ण होणार नाही.
काही टप्पे रखडलेत
मुंबई-गोवा महामार्गातील पनवेल, इंदापूर ते पात्रादेवी या ३६० कि.मी. अंतरामध्ये काही टप्पे रखडले आहेत. नवीन एजन्सी नेमली आहे. ११ महिन्यांची मुदत इंदापूर आणि माणगाव बायपासला दिली आहे. संगमेश्वर टप्पा मागे पडला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व्हिस रोड, परशुराम घाटातही ठेकेदाराकडून नवीन आराखडा करून काम केले जाईल. तेथील माती, दगड ठिसूळ झाल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 12/Mar/2025














