उबाठा गटाचे जयसिंग माने करणार शिवसेनेमध्ये प्रवेश

रत्नागिरी : रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूरमध्ये किरण भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. येत्या काही दिवसात संगमेश्वरमध्ये उबाठाला आणखी एक धक्का बसणार असून माजी सभापती आणि लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे क्षेत्रप्रमुख जयसिंग माने हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही महिन्यात शिवसेना आमदार किरण भैया सामंत यांनी विकास कामांना मोठी गती दिली आहे.

त्यामुळे उबाठातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते किरण सामंत यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख, माजी शिक्षण सभापती व देवळे गटाचे जयसिंग माने माजी सदस्य विलास चाळके यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे या भागातील शिवसेनेची ताकद वाढली आहे. सध्या या भागात उबाठामधून माजी पंचायत समिती सभापती व माजी पालकमंत्री रविंद्र माने यांचे खंदे समर्थक जयसिंग माने हे एक हाती किल्ला लढवत होते.

परंतु आ. सामंत यांच्या विकास कामाच्या घौडदौडीमुळे कार्यकत्यांनीही शिवसेनेत जाण्याचा आग्रह जया माने यांच्याकडे लावला आहे. ग्रामीण भागातील विकास कामे होणे आवश्यक असेल तर आ. किरण सामंत यांच्या पाठीशी राहिले पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

त्यांच्या आग्रहामुळे लवकरच जया माने शिवसेनेत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. सध्या आ. किरण भैया सामंत हे मतदार संघाच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांचा आढावा घेत असून, कामांचा शुभारंभही करीत आहेत. त्यामुळे आ. किरण भैया सामंत यांच्याशी चर्चा करुनच जयसिंग माने हे पुढील दिशा ठरवणार आहेत. येत्या दोन-चार दिवसात हा मोठा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता जया माने यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

गेली ३० वर्ष उबाठामध्ये कार्यरत असणाऱ्या जया माने यांनी आपल्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा राजीनामा माजी खासदार व उवाठाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताला अधिक बळकटी मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 02/Apr/2025