खेड : ‘त्या’ रासायनिक घनकचऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

रत्नागिरी : जिल्ह्यातील अत्यंत मोठी रासायनिक एमआयडीसी खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा समोर आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे कंपन्यांमधून प्रक्रिया करून झालेल्या घनकचरा गाळ आणि राख लोटे परिसरातीलच बोरज या गावी मोगळ्या जागांमध्ये टाकण्यात आला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर हे कृत्य करणारा आका कोण? असा गंभीर प्रश्न सर्वांना पडला आहे. या घटनेची तक्रार झाल्यानंतर जिल्हा प्रशासन देखील खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी संबंधित विभागाला या घटनेची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोटे एमआयडीसी परिसरात रासायनिक घनकचरा टाकला, हा प्रकल्प वारंवार घडत असतो. मात्र लोटे गावापासून काही अंतरावर असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज या गावांमध्ये ब्रिटीशकालीन दगडी बांधकामाचे धरण आहे. या धरणाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने रासायनिक घनकचरा आणि राख आणून टाकली त्याच ठिकाणी ती पसरवून त्यावर माती टाकून हा भयंकर प्रकार घडवण्याचा देखील प्रयत्न केला.

मात्र परिसरातील नागरिकांनी या प्रकाराला वाचा फोडली. परेश शिंदे या ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात तक्रारी केल्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून त्या मातीचे नमुने तपासणीसाठी कोल्हापूर येथील त्यांच्या लॅबमध्ये पाठवले. मात्र गंभीर बाब म्हणजे पावसामध्ये याच घनकचऱ्याचे पाणी बोरज धरणातील जलाशयात नैसर्गिक झऱ्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे असे झाले तर संपूर्ण शहरात या धरणाचे पाणी नागरिक पितात. दूषित पाणी झाल्यास मोठी रोगराई निर्माण होण्याची शक्यता आणि भीती वर्तविली गेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 02/Apr/2025