संगमेश्वर : आरवली उड्डाणपुलाखालील वाहनांवर दंडात्मक कारवाई

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील आठवडा बाजारासाठी आलेल्या आणि उड्डाणपुलाखाली उभा केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यामुळे व्यापारी व वाहनचालकांत नाराजी व्यक्त केलो जात आहे. आरवलीत महामार्गावर वाहने उभे करण्यासाठीची जागा निश्चित करावी, मगच वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, असा सूर वाहनधारकांनी व्यक्त केला.

आरवली येथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो, बाजारात विक्रीसाठी पाटण, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर इथून व्यापारी आपली वाहने घेऊन मोठ्या संख्येने येतात, आरवली परिसरातील ग्रामस्थ बाजारात खरेदी व विक्रीसाठी हजेरी लावतात. सध्या आरवलीतून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. इथूनच पुर्वेला कुचांबे व पश्चिमेला माखजन भागात जाण्यासाठी रस्ते आहेत. इथे बांधकाम खात्याने उड्डाणपूल बांधला आहे. या परिसरातच आठवडा बाजार भरतो. तेथील जागा रस्ता चौपदरीकरण व सेवा रस्त्यासाठी वापरण्यात आली आहे. आता बाजारासाठी आलेल्या व्यापारी व ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे व्यापारी व ग्राहक आपली वाहने उडाणपुलाखाली दोन्ही बाजूला उभी करतात.

त्या वाहनांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करीत आहेत, व्यापारी व ग्राहकांनी कारवाई चुकविण्यासाठी वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्न स्थानिक व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आठवडा बाजाराच्या निमित्ताने स्थानिक विक्रेत्यांना चार पैसे अधिक मिळतात. वाहतूक पोलिसांनी आधी पार्किंगचा प्रश्न सोडवावा, मगच कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

वाहतूक पोलिस बेकायदा होणाऱ्या अन्य धंद्यांवर कारवाई करत नाहीत, मात्र उड्डाणपुलाखाली बाजारासाठी येणाऱ्या कष्टकरी बांधवांची वाहने अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. नो पार्किंग फलक नसतानाही पुलाखाली उभ्या असणाऱ्या वाहनांवर होणारी कारवाई अयोग्य आहे. ही कारवाई थांबली नाही तर समस्त आस्वतीकर गप्प बसणार नाहीत- दत्ता परकर, वेदराज हॉटेल, आरवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 21/Apr/2025