चिपळूण : पेढांबे-अलोरे मार्गावर धोकादायक खड्डे

चिपळूण : पावसाळ्यात पेढांबे ते अलोरे मार्गावरील रस्त्यांवर पडणारे खड्डे हे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. त्याबरोबरच वाहनांच्यादृष्टीनेही हे खड्डे नुकसानदायक ठरत आहेत. खड्ड्यांमध्ये गाडी आदळून वाहनांचे स्पेअरपार्ट निखळणे, फायबरचे स्पेअरपार्ट तुटणे, टायरची झीज होणे, असे अनेक प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच गॅरेजमध्ये सर्व्हीसाठी येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून पेढांबे ते अलोरे आणि पेढांबे ते पोफळी या दोन्ही मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नागावे येथे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यालय आहे. त्या परिसरात प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याशिवाय पेढांबे पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यांत्रिकी विभागाच्या कार्यालयापासून पाचशे मीटरच्या अंतरावर मंदार कॉलेज आहे.

या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन महाविद्यालयाला यावे लागत आहे. पावसाने ओढ दिल्यानंतर हे खड्डे बुजवण्याची संधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत.

रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान होते, त्यामुळे दुरुस्तीच्या विविध कामांसाठी वाहनांची संख्या वाढत आहे. नेहमीचे वाहनचालक ठरलेल्या मुदतीच्या आधीच वाहन सर्व्हिसिंग करत आहेत- उमेश महाडिक, मेकॅनिक, काविळतळी चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 21/Aug/2025