Rabbi Hangam : जिल्ह्यात ६ हजार हेक्टरमध्ये होणार रब्बी पेरणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगाम वाया गेला असून काही तालुक्यात भात कापणी, तर काहीठिकाणी झोडणी, मळणी अंतिम टप्प्यावर आली आहे. गुहागरसह इतर तालुक्यात रब्बी हंगामसाठी नांगरणी झाली असून पेरणीस सुरूवात झाली आहे. यंदा ६ हजार हेक्टरवर रब्बी पीक पेरणीचे उद्दिष्ट आहे. पुढील आठवड्यापासून रब्बी पेरणीला वेग येणार असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा चार महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. भात पिकेही मोठ्या जोमात आली होती. मात्र सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, ऑक्टोबरमध्ये परतीच्या व अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा गेला आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीकरून भात पिके व्यवस्थित झाकून ठेवल्यामुळे पिके वाचली आहेत, तर काहींचे पीक पाण्यात भिजलेल आहे.

दरम्यान, खरीप हंगाम वाया गेला असून आता शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामसाठी हालचालीस सुरूवात झाली आहे. यंदा ६ हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर पेरण्याचे उद्दिष्ट आहे. दोन तालुक्यात पेरण्यास सुरूवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेला आहे. पुढील आठवड्यात पेरणीला वेग येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामची पेरणी होणार आहे. गुहागर, दापोली तालुक्यात पेरण्यास सुरूवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी भात कापणी, झोडणी, मळणी अंतिम टप्प्यावर आली आहे. पुढील आठवड्यात रब्बी पेरणीला वेग येईल- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

रब्बी हंगामात याची पेरणी
रब्बीच्या हंगामात शेतकरी कुळीथ, संकरित, मका, पावटा, कडधान्य यासारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियांणाची पेरणी करून पीक घेत असतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 07/Nov/2025