Ratnagiri : राजीवड्यातील नवीन जेटी बांधण्याला मिळतेय चालना

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राजीवडा समुद्रातील दुसऱ्या जेटीच्या कामाला चालना मिळाली आहे. पहिली जेटी रस्त्यापासून दूरवर असल्याने मच्छिमार नौकांवरील खलाशी व इतर वाहतूक करणाऱ्यांना गैरसोयीची असल्याने दुसऱ्या जेटीची मागणी भाजपाचे शहर सचिव समीर वस्ता यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
राजीवडा समुद्रातून अनेक मच्छीमार नौकांची ये-जा होत असते. याठिकाणी जुनी एकच जेटी असून ती वाहतुकीच्या रस्त्यापासून दूर आहे. त्यामुळे नौकांमधील मासळी उतरवून ती रस्त्यापर्यंत आणणे त्रासदायक असते.

मच्छी व्यावसायिक महिलांचीसुद्धा यामुळे गैरसोय होते. त्याचबरोबर मच्छीमार नौका किनाऱ्यापासून समुद्रात दूरवर उभ्या करून ठेवाव्या लागतात. त्यामुळे या नौकांमध्ये जाण्या-येण्यासाठी होड्यांचा वापर करावा लागतो. मासळी वाहतुकीच्या संदर्भात आणि मच्छीमार नौकांपर्यंत होडीने जाण्यायेण्याचा त्रास टाळण्यासाठी नवीन जेटीची गरज असल्याचे शहर सचिव वस यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात निवेदन देवून योग्य ठिकाणी नवीन जेटी बांधणी करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 10/Nov/2025