रत्नागिरी : कार्तिकी वारीनिमित्त दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी ही रत्नागिरी विभागाच्या वतीने पंढरपूरसाठी जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. तब्बल १६२ गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते. वारीत लाखो प्रवाशांनी प्रवास केला असून ८१ हजार किलोमीटर लालपरी धावली होती. रत्नागिरी विभागास आषाढीनंतर कार्तिक वारीला ही विठुराया पावला असून तब्बल ७५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
आषाढी वारीनंतर कार्तिक वारीला विशेष महत्व असते. महाराष्ट्रासह इतर राज्यातील तब्बल ६ ते ७ लाख वारकरी, भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. लाखो वारकरी विठु नामाचा गजर करीत पंढरीत लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
ज्यांना पायी शक्य नाही, असे भाविक, वारकरी लालपरीने प्रवास करीत पंढरपूरला जात असतात. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने १६२ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. लांजा, राजापूर, रत्नागिरी, देवरूख, चिपळूण, दापोली, खेड यांच्यासह विविध आगारातील सर्वच गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले. २७ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.
कार्तिकी वारीत रत्नागिरी विभागास विठुराया पावला असून ७५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे आषाढीनंतर कार्तिकीवारीत लाखो प्रवाशांनी प्रवास केला असून दिवाळी, वारीत तब्बल पावणेदोन कोटींचे उत्पन्न रत्नागिरी विभागास मिळाले आहे.
दिवाळी, वारीत रत्नागिरी विभागास पावणेदोन कोटींचे उत्पन्न
दिवाळीनिमित्त, कार्तिकवारीसाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. दिवाळीत एक कोटीचे उत्पन्न मिळाले होते तर कार्तिक वारीत ७५ लाखांचे उत्पन्न मिळाले. दोन्ही मिळून पावणेदोन कोटींचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला मिळाले.
ज्येष्ठ, महिलांना सवलतीचा लाभ
कार्तिक वारीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक, महिला, ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक नागरिकांसाठी सवलत सुरू होती. लाखो प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.
कार्तिकवारीसाठी पंढपूरला जाण्यासाठी १६२ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. वारकरी, भक्त, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल ७५ लाखांचे उत्पन्न रत्नागिरी विभागास मिळाले आहे. दिवाळी, वारीत तब्बल पावणेदोन कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. सवलतधारकांनी सवलतीचा लाभ घेतला. –प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 10/Nov/2025














